
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यात गुरुवारी काही भागांत वादळी पावसाने हजेरी लावली. मात्र, या पावसासोबत आलेल्या वीजेच्या कडकडाटाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन कुटुंबांवर मोठा आघात केला. सिल्लोड तालुक्यातील दहिगाव आणि कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा परिसरात वीज पडण्याच्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील दहिगाव शिवारात गुरुवारी दुपारी वादळी वातावरण निर्माण झाले. पावसापासून बचाव करण्यासाठी शेतात असलेले मनोहर भिवसन दुधे (60) आणि त्यांच्या पत्नी पर्वताबाई मनोहर दुधे (57) यांनी आसरा घेतला होता. याचवेळी अचानक वीज कोसळल्याने दोघेही गंभीररीत्या भाजले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने दहिगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत कुटुंबातील आणखी एक सदस्य जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. वादळी पावसाच्या वेळी शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.
दुसरी घटना कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा परिसरात घडली. शेतातील काम सुरू असताना अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली. त्याचदरम्यान वीज कोसळल्याने काही जण त्याच्या तडाख्यात सापडले. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिलांसह एका चिमुकलीचा समावेश असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच मंत्री संजय शिरसाट यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले आणि धीर दिला. तसेच, शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना सुरुवातीला स्थानिक पातळीवर उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.
दोन्ही घटनांची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आमदार संजना जाधव, तहसीलदार सारिका भगत यांच्यासह संबंधित अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको आणि टीव्ही सेंटर परिसरात अल्पावधीत जोरदार पाऊस झाला. अवघ्या काही मिनिटांच्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. मात्र, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांवर परिणाम झाला असून, शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
पावसाची प्रतीक्षा असतानाच वीज कोसळून झालेल्या या दुर्घटनांनी जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी शक्यतो मोकळ्या शेतात, झाडाखाली किंवा उघड्या ठिकाणी थांबणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



