मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, महायुतीने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत महायुतीने तब्बल १७ पैकी १६ जागांवर विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. तर महाविकास आघाडीला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही.
१८ जून रोजी झालेल्या मतदानानंतर रविवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मात्र, या निवडणुकीत मतदानापूर्वीच १७ पैकी ६ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे प्रत्यक्ष लढत केवळ ११ जागांसाठी झाली. या ११ पैकी १० जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजयाचा झेंडा फडकावला.
मात्र, नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीला अनपेक्षित धक्का बसला. शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी पराभव केला. या निकालामुळे नाशिकमध्ये महायुतीच्या अंतर्गत नाराजीचा आणि बंडखोरीचा फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आपली ताकद पुन्हा सिद्ध केली. दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची महाविकास आघाडी मात्र पूर्णपणे अपयशी ठरली. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही.
या निकालामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच राज्यातील इतर राजकीय समीकरणांवर महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः महायुतीसाठी हा विजय आगामी निवडणुकांपूर्वी मोठा आत्मविश्वास वाढवणारा मानला जात आहे, तर महाविकास आघाडीसाठी हा निकाल आत्मपरीक्षण करण्याची वेळ आणणारा ठरला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींचा महायुतीवरील विश्वास या निकालातून स्पष्ट झाला असून, राज्याच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र नाशिकमधील अपक्ष उमेदवाराच्या विजयाने पक्षांतर्गत नाराजी आणि स्थानिक पातळीवरील समीकरणांचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे.
विधान परिषदेच्या १७ जागांचा निकाल
नाशिक- गोकुळ गिते, (अपक्ष) भाजपचे बंडखोर उमेदवार
छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट- भाजप
जळगाव- नंदकिशोर महाजन, भाजप
अमरावती- प्रवीण पोटे, भाजप
नांदेड- अमर राजूरकर, भाजप
सोलापूर- राजेंद्र राऊत, भाजप
भंडारा- गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर, भाजप
सांगली- सातारा- धैर्यशील कदम, भाजप
धाराशिव-लातूर- बीड- बसवराज पाटील, भाजप
नागपूर- राजीव पोतदार, भाजप
परभणी- हिंगोली- सईद खान, शिवसेना
महायुतीचे ६ बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना, (बिनविरोध)
यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना, (बिनविरोध)
रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
पुणे – विक्रम काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप, (बिनविरोध)
अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप, (बिनविरोध)



