नांदेड : वृत्तसंस्था
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या कथित फुटीच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीवर जोरदार टीका केली आहे. पक्षातील लोकप्रतिनिधींशी संवादाचा अभाव आणि त्यांना भेटण्यासाठी वेळ न देणे हीच पक्षातील असंतोषाची प्रमुख कारणे असल्याचा दावा करत सामंत यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
नांदेड येथे माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत यांनी ठाकरे गटातील खासदारांच्या कथित बंडाबाबत सावध भूमिका घेतली. “सध्या कोणतेही बंड अधिकृतपणे झाल्याचे दिसत नाही. ना दूरचित्रवाणी वाहिन्यांवर तसे काही समोर आले आहे, ना सोशल मीडियावर. त्यामुळे या टप्प्यावर थेट बंड झाले आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही,” असे ते म्हणाले.
मात्र, याचवेळी त्यांनी ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. “पक्षातील आमदार आणि खासदारांशी संपर्क न ठेवणे, त्यांच्याशी संवाद न साधणे आणि त्यांना भेटण्यासाठी वेळ न देणे, ही परिस्थिती नवीन नाही. यापूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती,” असे सामंत यांनी सांगितले.
उदय सामंत यांच्या विधानामुळे ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी पुन्हा चर्चेत आली आहे. पक्षातील लोकप्रतिनिधींना योग्य वागणूक मिळत नसल्याची भावना निर्माण झाल्यास त्याचे परिणाम संघटनात्मक पातळीवर दिसून येतात, असे संकेत त्यांनी दिले. सामंत यांच्या मते, पक्ष नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सातत्याने संवाद राहणे आवश्यक असते. मात्र, संवाद तुटल्यास नाराजी वाढते आणि त्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागतात. त्यांच्या या वक्तव्याचा रोख थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीकडे असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
उदय सामंत यांच्या विधानामुळे जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिवसेनेतील मोठ्या बंडाची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. त्या वेळीही अनेक आमदारांनी पक्षप्रमुखांशी संवाद होत नसल्याची आणि पक्षातील निर्णयप्रक्रियेत सहभाग मिळत नसल्याची तक्रार केली होती.
स्वतः उदय सामंत हे त्या बंडातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. त्यामुळे “अशी परिस्थिती यापूर्वीही निर्माण झाली होती” या त्यांच्या विधानाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्याच्या खासदार फुटीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटातील असंतोषाच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे आधीच राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशा वेळी उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना नवे परिमाण मिळाले आहे. मात्र, संबंधित खासदारांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले असून, पक्ष एकसंध असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या राजकीय घडामोडींना कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



