मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’वर ठाकरे गटाने मोठे स्पष्टीकरण दिले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला ठाकरे गटाचे सर्व नऊ खासदार उपस्थित होते आणि पक्षात कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा खासदार संजय राउत यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. काही खासदारांनी शिंदे गटाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे ठाकरे गटात मोठी फुट पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर १४ जून रोजी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संसदीय गटाची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सर्व चर्चांना उत्तर दिले.
राऊत म्हणाले की, बैठकीला अरविंद सावंत, संजय दिना पाटील, अनिल देसाई आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर उर्वरित खासदारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदविला.
काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित नसल्याबाबत स्पष्टीकरण देताना राऊत यांनी सांगितले की, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे चिरंजीव पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत असल्याने ते तेथूनच बैठकीत सहभागी झाले. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी आजारी असल्याने त्यांनीही रुग्णालयातून ऑनलाइन सहभाग घेतला. नागेश आष्टीकर हे त्यांच्या चिरंजीवांच्या निवडणूक प्रचारात व्यस्त होते, तर वाशीमचे खासदार संजय देशमुख यांच्या घरी कौटुंबिक कार्यक्रम सुरू असल्याने त्यांनी ऑनलाइन माध्यमातून उपस्थिती दर्शविली. “नऊच्या नऊ खासदारांनी बैठकीत सहभाग घेतला. पक्षात कोणतीही नाराजी नाही. सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामागे ठामपणे उभे आहेत,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.
बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आगामी राजकीय घडामोडी, पक्ष संघटना आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदारांना मार्गदर्शन केल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकलेले खासदार पुढील काही दिवसांत ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. दरम्यान, या स्पष्टीकरणामुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना काही काळासाठी तरी पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे या चर्चांवर अद्याप पडदा पडलेला नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.



