जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील विदगाव जवळील तापी नदीपात्रात बुडून एका १५ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यश अशोक भालेराव (१५, रा. किनगाव, ता. यावल) असे या मुलाचे नाव असून, पोलिसांकडून त्याची ओळख पटवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव येथील रहिवासी असलेला यश हा जळगाव शहरात एका वसतिगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण करत होता. सोमवारी तो जळगावहून आपल्या मामाच्या गावी किनगावला जाण्यासाठी निघाला होता. वाटेत विदगावजवळ तो आपल्या मित्रांसोबत तापी नदीच्या पात्रात उतरला. मात्र, हे धाडस त्याच्या जीवावर बेतले.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हा काहीसा गतिमंद होता तसेच त्याची दृष्टीही अधू होती. त्यामुळे नदीपात्रात खेळत असताना त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. बघता बघता तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला. माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने नदीकडे धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर यशचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे. यशला दोन भाऊ असून त्याची आई बाहेरगावी राहते. तो जळगावहून किनगावला मामाच्या गावी एकटाच ये-जा करत असायचा, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.



