धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील रेल येथे क्रिकेट खेळत असताना १२ वर्षीय गणेश नवल पाटील या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना १३ मार्च २०२६ रोजी घडली होती. या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मुलाचा मृत्यू नैसर्गिक होता की त्यामागे घातपात होता. याचा तपास करण्यासाठी तब्बल दोन महिने २० दिवसांनंतर मंगळवारी प्रशासनाने पुरलेला मृतदेह बाहेर काढून सांगाडा फॉरेन्सिक तपासणीसाठी धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला आहे.
रेल येथील गणेश पाटील हा पाळधी येथील शाळेत सहावीत शिक्षण घेत होता. १३ मार्च रोजी सायंकाळी ६:३० ते ७ वाजेच्या सुमारास गावातील मैदानावर काही मुले क्रिकेट खेळत होती. त्यावेळी गणेश अचानक चक्कर येऊन खाली पडल्याचे त्याच्या सोबतच्या मुलांनी सांगितले. त्यानंतर त्याला घरी आणून वडील नवल पाटील यांना माहिती देण्यात आली.
वडिलांनी तत्काळ गणेशला जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन न करता मृतदेह गावात आणण्यात आला आणि त्याच रात्री सुमारे १० वाजता नदीकाठी त्याला पुरण्यात आले.
घटनेच्या दीड महिन्यानंतर गणेशचा मृत्यू हा छातीत एका मुलाने बॅट मारल्याने झाल्याची कुजबुज सुरू झाली. ही माहिती समजल्यानंतर गणेशचे वडील नवल पाटील यांनी पाळधी दूरक्षेत्रात तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची चौकशी केली असता, गणेशच्या छातीत बॅट लागल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी पोलिस अधीक्षक आणि धरणगाव तहसीलदार यांच्याकडे परवानगी मागितली. त्यानुसार मंगळवारी मृतदेह बाहेर काढण्यात आला. नवल पाटील यांनी २२ मे रोजी न्यायालयात तक्रारही दाखल केली आहे. गणेशचा सांगाडा बाहेर काढल्यानंतर वडील नवल पाटील यांच्यासह आई आणि बहिणीलाही रडू कोसळल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. पंचनाम्यावेळी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक हंसराज पवार, सहायक पोलिस निरीक्षक भूषण कोते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, फॉरेन्सिक पथक उपस्थित होते.



