लाईव्ह महाराष्ट्र न्युज : राज्यातील भेसळखोर, प्रतिबंधित गुटखा विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई सुरू केली आहे. नव्याने आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतलेल्या तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच अवघ्या तीन दिवसांत राज्यभरात 53 धाडी टाकून प्रशासनाचा धाक निर्माण केला आहे. या मोहिमेत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 33 जणांना अटक करण्यात आली आहे.
पदभार घेताच कडक निर्देश
25 मे रोजी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देत अधिकाऱ्यांना तातडीने विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर विभागात एकाच वेळी छापेमारी सुरू करण्यात आली. या मोहिमेत गुटखा, पानमसाला, अस्वच्छ अन्न उत्पादन, बेकायदेशीर साठा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर थेट कारवाई करण्यात आली.
53 धाडी, 25 गुन्हे दाखल
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी राज्यभरातील संशयित आस्थापनांवर छापे टाकून 53 ठिकाणी तपासणी केली. त्यापैकी 34 ठिकाणी बंदी असलेला गुटखा आणि पानमसाल्याची विक्री सुरू असल्याचे उघड झाले.
या प्रकरणात पोलिसांनी 25 एफआयआर दाखल केले असून 33 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच गुटखा वाहतूक करणारी 5 वाहने जप्त करण्यात आली असून 27 आस्थापनांना सील करण्यात आले आहे.
मुंबई विभागात सर्वात मोठी कारवाई
या धडक मोहिमेत सर्वाधिक कारवाई मुंबई विभागात करण्यात आली. बृहन्मुंबई विभागातील 19 आस्थापनांवर धाडी टाकून सर्व ठिकाणे सील करण्यात आली. तसेच 19 जणांविरोधात गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.
प्रशासनाने विशेषतः प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि दिशाभूल करणाऱ्या पॅकिंगवर मोठा प्रहार केला आहे.
28 लाखांचा संशयित अन्नसाठा जप्त
गुटखा आणि पानमसाल्यासोबतच FDA ने विविध खाद्यपदार्थांच्या शुद्धतेचीही तपासणी केली. पॅकबंद पाणी, दूध, नुडल्स, खाद्यतेल, फरसाण, आईसक्रीम, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन आणि बेकरी पदार्थांच्या उत्पादन प्रक्रियेची तपासणी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान सुमारे 28 लाख 78 हजार रुपयांचा संशयास्पद आणि नियमबाह्य अन्नसाठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
भेसळखोरांना स्पष्ट इशारा
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या मोहिमेमुळे राज्यातील भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात पुढील काळात आणखी कठोर कारवाई होण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.



