मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील लाखो मोबाईल वापरकर्त्यांना शनिवारी सकाळी ११:४५ वाजता अचानक सायरनचा मोठा आवाज ऐकू आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मोबाईल स्क्रीनवर हिंदी आणि इंग्रजी भाषेत एक संदेश दिसत होता, तर सायरन थांबल्यानंतर तोच संदेश मोबाईलद्वारे मोठ्याने वाचूनही दाखवण्यात आला. या अनपेक्षित अलर्टमुळे अनेक नागरिक घाबरले, तर काहीजण संभ्रमात पडले. मात्र, हा कोणताही धोका नसून ही केवळ आपत्कालीन संदेश प्रणालीची चाचणी असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. ही चाचणी National Disaster Management Authority (NDMA) यांच्या वतीने करण्यात आली होती.
NDMA ने २ मे रोजी देशभरात ‘सेल ब्रॉडकास्ट’ (Cell Broadcast – CB) तंत्रज्ञानावर आधारित आपत्कालीन अलर्ट प्रणालीची चाचणी केली. या प्रणालीद्वारे निवडलेल्या परिसरातील सर्व मोबाईल फोनवर एकाच वेळी संदेश पाठवता येतो. विशेष म्हणजे, यासाठी इंटरनेट किंवा स्वतंत्र ॲपची गरज नसते. या तंत्रज्ञानामुळे नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती किंवा इतर आपत्कालीन प्रसंगी नागरिकांपर्यंत तात्काळ आणि अचूक माहिती पोहोचवणे शक्य होणार आहे.
शनिवारी देशातील सर्व राज्यांच्या राजधानींसह दिल्ली-एनसीआर परिसरात ही चाचणी करण्यात आली. मोबाईलवर आलेला संदेश हिंदी, इंग्रजीसह विविध प्रादेशिक भाषांमध्ये होता. त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले होते की, “हा केवळ चाचणी संदेश आहे, यावर कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही.” या चाचणीपूर्वी दोन दिवस आधीच सरकारने SMS द्वारे नागरिकांना सूचित केले होते की, अशा प्रकारचा अलर्ट मिळाल्यास घाबरू नये. तरीही अचानक सायरन वाजल्यामुळे काही ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या चाचणीमुळे देशातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेत सतर्क करण्यास मदत होईल. तज्ज्ञांच्या मते, ही प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित झाल्यास अनेक जीव वाचवता येऊ शकतात.



