मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, महाविकास आघाडीतून आता ठाकरेंनाच पुन्हा संधी देण्याची जोरदार मागणी पुढे येत आहे.
आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने आधीच या जागेसाठी अनुकूलता दर्शवली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडूनही ठाकरेंनाच पाठिंबा देण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदार सुप्रिया सुले यांनी सोशल मीडियावर ट्विट करत ठाकरेंनीच ही निवडणूक लढवावी, अशी विनंती केली आहे.
सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील विधानपरिषदेची निवडणूक माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनीच लढावी, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आग्रहाची भूमिका आहे. उद्धवजी हे अनुभवी व ज्येष्ठ नेते असून त्यांच्या अनुभवाचा राज्याला व सभागृहाला मोठा फायदा होईल. त्यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा, ही नम्र विनंती.”
दरम्यान, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही यासंदर्भात भूमिका स्पष्ट करत म्हटले आहे की, “उद्धव ठाकरे निवडणूक लढवत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र त्यांनी न लढवण्याचा निर्णय घेतल्यास महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, यावर तातडीने चर्चा करावी लागेल.” तसेच पुढील राज्यसभा निवडणुकांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले.
यापूर्वी काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘मातोश्री’वर जाऊन ठाकरेंची भेट घेत त्यांना निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा एकमुखी पाठिंबा उद्धव ठाकरे यांनाच असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर आता स्वतः उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या निर्णयावर केवळ विधानपरिषद निवडणुकीचेच नव्हे, तर आगामी राजकीय समीकरणांचेही गणित अवलंबून राहणार आहे.



