मुंबई : प्रतिनिधी
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्यावर महिलाविरोधी मानसिकतेचा आरोप केला. संसदेत या विधेयकाला आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत मिळू न दिल्याने विरोधकांनी देशातील सुमारे 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला, अशी टीका त्यांनी केली.
फडणवीस म्हणाले की, 17 एप्रिल हा दिवस देशाच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात निर्णायक ठरेल अशी अपेक्षा होती. त्या दिवशी महिला आरक्षण विधेयक मंजूर होईल, अशी सर्वसाधारण भावना होती. मात्र काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, ठाकरे गट, शरद पवार गट आणि समाजवादी पक्ष यांसह अनेक विरोधी पक्षांनी या विधेयकाला आवश्यक पाठिंबा न दिल्याचा आरोप त्यांनी केला.
“विरोधकांनी केवळ विधेयक रोखले नाही तर त्याची भ्रूणहत्या केली. त्यानंतर आनंदोत्सव साजरा करून त्यांनी समाजसुधारकांच्या विचारांचा अवमान केला,” असे ते म्हणाले.
महात्मा जोतिबा फुले यांच्या 200 व्या जयंती वर्षातच विरोधकांनी त्यांच्या विचारांना तिलांजली दिल्याची टीका करत फडणवीस यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांवर हल्ला चढवला. “भाषणापुरते फुले नाव घेणारे हे पक्ष वास्तवात उघडे पडले आहेत,” असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी घटनात्मक प्रक्रियेचा उल्लेख करत 1976, 2002 आणि 2023 मधील डीलिमिटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्त्यांचा संदर्भ दिला. जनगणना कोविडमुळे 2027 पर्यंत लांबल्याने आणि डीलिमिटेशन प्रक्रिया वेळ घेणारी असल्याने सरकारने विधेयक आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या विधेयकाच्या समर्थनार्थ राज्यात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. “महाराष्ट्रातील 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा केल्या जातील आणि तालुका पातळीपर्यंत जनजागृती केली जाईल,” असे ते म्हणाले. महिला आरक्षण लागू होईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. यासाठी महायुतीकडून राज्यभरात व्यापक मोहीम राबवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



