मुंबई : वृत्तसंस्था
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळ्यांचे आयोजन होत असताना, बालविवाह रोखण्यासाठी राज्य प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी राज्यस्तरीय व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
राज्यातील सर्व सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांना गावामध्ये होणाऱ्या विवाहांपूर्वी वधू-वरांच्या वयाची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः अक्षय्य तृतीयेच्या दिवशी होणाऱ्या विवाह सोहळ्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, पोलीस विभाग आणि स्थानिक प्रशासनाला समन्वयाने काम करण्यास सांगितले आहे.
तालुका आणि ग्रामस्तरावर विशेष पथके स्थापन करण्यात येणार असून, देवस्थान, मंगल कार्यालये आणि इतर विवाहस्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. बालविवाहाचे कोणतेही प्रकरण आढळल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, पोलीस आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जिल्हानिहाय कृती आराखडे तयार करण्यात येत आहेत. सर्व तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्यास सांगण्यात आले आहे.
याशिवाय, विवाहाशी संबंधित सेवा पुरवणाऱ्या मंगल कार्यालये, केटरर्स, प्रिंटिंग प्रेस, फोटोग्राफर, वाजंत्री तसेच धर्मगुरूंना वधू-वरांचे वय पडताळल्याशिवाय कोणतीही सेवा देऊ नये, अन्यथा त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बालविवाह रोखण्यासाठी जनजागृतीवरही भर देण्यात येत असून, गावोगावी दवंडी, पोस्टर मोहिमा, विशेष ग्रामसभा, शाळांमधील पालक बैठक तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रचार केला जाणार आहे.
दरम्यान, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, बालविवाहासंदर्भातील कोणतीही माहिती चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा डायल 112 वर द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल. राज्यात बालविवाहास आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेला समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले आहे.



