नागपूर : वृत्तसंस्था
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली असताना, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी या प्रकरणासंदर्भात अत्यंत गंभीर आणि स्फोटक आरोप केले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे थेट सत्ताधाऱ्यांशी जोडलेले असल्याचा दावा करत त्यांनी तपास प्रक्रियेवरही संशय व्यक्त केला आहे.
प्रा. मानव यांनी म्हटले की, “हे प्रकरण आज घराघरात पोहोचण्यामागे राजकीय संबंध हेच मुख्य कारण आहे. जर या बाबाचा संबंध सत्ताधाऱ्यांशी नसता, तर कदाचित पोलिसांनी हे प्रकरण दडपून टाकले असते.” त्यांनी पुढे असा आरोप केला की, काही राजकीय नेत्यांना धडा शिकवण्यासाठीच पोलिसांना तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.
अशोक खरातच्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना त्यांनी धक्कादायक माहिती उघड केली. त्यांच्या मते, खरात लोकांच्या काळ्या पैशांची माहिती मिळवून त्यावर बनावट ‘इन्कम टॅक्स’ धाडी टाकायचा. यासाठी तो स्वतःचे बनावट अधिकारी तयार करत असे आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळत असे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारात आतापर्यंत कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने किंवा राजकीय व्यक्तीने हस्तक्षेप केला नसल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय, समाजातील अंधश्रद्धेच्या वाढत्या प्रभावावरही प्रा. मानव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “आजच्या काळात महिलांना भीती दाखवून नव्हे, तर ‘गुरु’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण करून अनेक भोंदू लोक त्यांचा गैरफायदा घेत आहेत. ही अत्यंत चिंताजनक आणि शोकांतिका असलेली बाब आहे.” त्यांनी असेही नमूद केले की, हजारो वर्षांपासून अशा गोष्टींना संस्कृतीचा भाग मानले जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या उघडकीस येण्यामागे राजकीय अंतर्गत संघर्ष असल्याचा टोला लगावत त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे उपरोधिक आभार मानले. “जर संबंधित राजकीय नेत्यांशी या बाबाचे संबंध समोर आले नसते, तर कदाचित हे प्रकरण कधीच बाहेर आले नसते,” असे ते म्हणाले.
या सर्व आरोपांमुळे अशोक खरात प्रकरणाला आता केवळ गुन्हेगारी नव्हे, तर राजकीय व सामाजिक परिमाणही प्राप्त झाले असून, याचा तपास कोणत्या दिशेने पुढे जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



