पाळधी सबस्टेशनचा खेळखंडोबा! महावितरणमुळे उद्योग ठप्प; रोजगार धोक्यात, आंदोलनाचा इशारा
जळगाव : विजय पाटील
जिल्ह्यातील पाळधी सबस्टेशन अंतर्गत एक्सप्रेस फिडरवरील वीज पुरवठ्याच्या सतत खंडित होणाऱ्या समस्येमुळे स्थानिक उद्योजक आणि कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. जैन कंपनी, बॉश कंपनीसह विद्यापीठ परिसरातील लहान व्यवसायिकांना या अस्थिर वीज पुरवठ्यामुळे मोठा फटका बसला असून रोजगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
व्यवसायिकांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी केल्या असून पत्राद्वारेही लक्ष वेधले आहे. तरीही समस्या सुटत नसल्याने आता व्यावसायिक व कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. नागरिकांचा आरोप आहे की, पाळधी सबस्टेशनचा कारभार पूर्णपणे भोंगळ असून महावितरणकडून गंभीर दुर्लक्ष केले जात आहे.
विशेष म्हणजे, एक्सप्रेस फिडरवरून वीज पुरवठा होत असल्याने नियमित दरापेक्षा अधिक वीज दर आकारला जातो. तरीही सुरळीत वीज पुरवठा न मिळाल्याने लहान व्यवसायिकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून उद्योजक हा त्रास सहन करत असून, वेळेवर वीज बिल भरूनही त्यांना योग्य सेवा मिळत नाही.
या परिस्थितीमुळे स्थानिक उद्योगजक व कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. “महावितरण कंपनी याकडे लक्ष देणार का?” असा प्रश्न आता सर्वत्र विचारला जात आहे. वीज पुरवठ्याच्या अस्थिरतेमुळे उत्पादन थांबत असून कामगारांच्या रोजगारावर गदा आली आहे.
महावितरणकडून तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास उद्योजक व कामगार रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे हीच काळाची गरज ठरली आहे.



