मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसबाबत ‘डाऊनफॉल’ सुरू असल्याचे विधान करणाऱ्या पार्थ पवार यांना सौम्य शब्दांत सुनावले आहे. “कोणताही राजकीय पक्ष असा संपत नसतो. प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीने काम करत असतो,” असे स्पष्ट मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका करत राज्यात त्यांच्या अधोगतीला सुरुवात झाल्याचे म्हटले होते. या विधानावर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर शरद पवार व सुप्रिया सुळे यांनीही पार्थ पवारांना संयमाचा सल्ला दिला होता. आता रोहित पवारांनीही हे विधान घाईगडबडीत झाल्याचे सांगत त्यावर नाराजी व्यक्त केली.
रोहित पवार म्हणाले की, निवडणुकीच्या प्रक्रियेत अर्ज भरणे आणि मागे घेणे या टप्प्यांदरम्यान संवाद व समन्वय महत्त्वाचा असतो. “राजकारणात परिपक्वता आवश्यक असते. मात्र पार्थ पवारांनी घाईत केलेले विधान योग्य नव्हते,” असे त्यांनी नमूद केले. सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेते काँग्रेसशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसेच, “तुम्ही सत्तेत असाल किंवा विरोधात, जमिनीवर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असा सल्लाही त्यांनी दिला. पार्थ पवार स्वतःही त्यांच्या विधानाचा विपर्यास झाल्याचे मान्य करतील, असेही ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसकडून पार्थ पवार यांना ‘कृतघ्न’ म्हटल्याच्या मुद्द्यावर रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली. “पार्थ पवार कदाचित चुकले असतील, पण एका मुलाची आपल्या वडिलांविषयी असलेली भावना यातून दिसते. त्यामुळे त्यांना कृतघ्न म्हणणे योग्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, ही सर्वांचीच अपेक्षा आहे. “महाराष्ट्रात एफआयआर दाखल होत नसताना काँग्रेस शासित कर्नाटकमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत,” असेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण घडामोडींमुळे बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.



