जळगाव, दि.2 एप्रिल – जळगाव जिल्ह्याची ओळख असलेल्या केळी पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती तसेच निर्याताभिमुख मूल्यसाखळी प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी रावेर तालुक्यातील अटवाडे येथे प्रगतशील शेतकरी वरुण अग्रवाल यांच्या केळी बागेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या क्षेत्रभेटीद्वारे केळी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेले प्रयोग तसेच कापणीपश्चात व्यवस्थापनाची प्रक्रिया यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी केळी लागवडीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक मल्चिंग, गादीवाफा (Raised Bed) पद्धत, योग्य लागवड अंतर, तसेच दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादन मिळण्यासाठी वापरले जाणारे ‘बड इंजेक्शन’ तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती घेतली. आधुनिक मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाची उत्पादकता वाढविणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि रोग-कीड नियंत्रण अधिक प्रभावीपणे करणे यासाठी या पद्धती कशा उपयुक्त ठरतात याबाबतही चर्चा करण्यात आली.
तसेच शेतात केळी घडांची शास्त्रोक्त पद्धतीने होणारी कापणी, त्यानंतरची वर्गवारी (ग्रेडिंग), स्वच्छता, पॅकिंग आणि निर्यातीसाठी तयार होणारी प्रक्रिया यांचेही जिल्हाधिकाऱ्यांनी बारकाईने निरीक्षण केले. शेतातून थेट बाजारपेठेपर्यंत पोहोचणाऱ्या ‘व्हॅल्यू चेन’ प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान मिळविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधताना श्री. घुगे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि मूल्यवर्धन यावर भर दिला. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (FPC) माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन प्रक्रिया उद्योग, पॅकिंग, साठवणूक व निर्यात याकडे लक्ष दिल्यास केळी पिकाला अधिक शाश्वत आणि चांगला बाजारभाव मिळू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादनाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी असून रावेर परिसरातील शेतकऱ्यांनी आत्मसात केलेल्या आधुनिक पद्धतीमुळे या पिकाची गुणवत्ता अधिक सुधारत आहे. तंत्रज्ञानाचा वापर, योग्य व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन यामुळे जळगावची केळी जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करत असून ही प्रगत शेती पद्धती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समावेत कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



