नागपूर : वृत्तसंस्था
“महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून राज्याला पुढे नेणे, हाच आपल्या नव्या वर्षाचा संकल्प आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने केले.
गुढीपाडवा निमित्त नागपुरात आयोजित भव्य शोभायात्रेत सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. आधुनिकतेसोबतच प्राचीन परंपरा, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा हा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नरेंद्र मोदी यांनीही ‘विकास आणि विरासत’ या संकल्पनेवर भर दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजीनामा प्रकरणामुळे नाराज असल्याचे म्हटले जात असलेले आमदार संदीप जोशी यांची नाराजी दूर झाल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. संदीप जोशी आणि मित्रपरिवारातर्फे दरवर्षी या शोभायात्रेचे आयोजन केले जाते आणि आपण दरवर्षी यात सहभागी होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागपूर शहर भगव्या रंगात रंगलेले पाहायला मिळाले. नववर्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्याचे सांगत, हे वर्ष चांगले जावे यासाठी सरकार कटिबद्ध असून भगवंताच्या कृपेने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.



