मुंबई : वृत्तसंस्था
इराण-इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. राज्यात कुठेही पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, काही माध्यमांमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. त्यामुळे अनेक शहरांतील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी घाईघाईने इंधन भरण्यासाठी गर्दी केली आणि मोठ्या रांगा लागल्या. मात्र प्रत्यक्षात राज्यात कुठेही इंधन टंचाई नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने ऊर्जा सुरक्षेबाबत योग्य ती पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम आहे. त्यामुळे नागरिकांनी चुकीची माहिती पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करू नये, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आखातातील तणावाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत असल्याचे दिसत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर भारतात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही १५० ते २०० रुपयांची वाढ झाल्याने हॉटेल आणि खाद्यव्यवसायिकांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. काही शहरांमध्ये गॅस वितरणात अडथळे येत असल्याच्या तक्रारी समोर येत असून, पुण्यातील काही महिलांनी गॅस वितरणातील विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. गॅस, इंधन तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांमुळे घरखर्चाचे गणित बिघडत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तथापि, राज्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत असून इंधन टंचाईबाबत पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा केले आहे.



