मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपली उमेदवार यादी जाहीर करत राजकीय वातावरण तापवले आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्रातून विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यातील सात जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 मार्च आहे. 6 मार्च रोजी अर्जांची छाननी होईल, तर 9 मार्चपर्यंत माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
माजी मंत्री आणि सध्या भाजपच्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस असलेले विनोद तावडे यांना उमेदवारी देत पक्षाने संघटनात्मक अनुभवाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट केले आहे. तावडे यांनी शालेय शिक्षण, उच्च व तांत्रिक शिक्षण, क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि मराठी भाषा व संस्कृती या खात्यांचे मंत्रिपद भूषविले आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. संघटनात्मक पातळीवर सक्रिय असलेल्या तावडे यांना राज्यसभेची संधी देत भाजपने त्यांना पुन्हा संसदीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले आहे.
रिपाइंचे नेते रामदास आठवले यांची उमेदवारी यंदा चर्चेत होती. त्यांचा पत्ता कट होणार, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच भाजपने आपल्या कोट्यातून त्यांना सलग तिसऱ्यांदा संधी दिली. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली होती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील माजी आमदार रामराव वडकुते यांना उमेदवारी देत भाजपने धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले वडकुते 2019 पूर्वी भाजपमध्ये दाखल झाले. विधान परिषद सदस्य म्हणून काम केल्यानंतर आता त्यांना राज्यसभेची संधी मिळाली आहे.
नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते या आदिवासी नेत्या असून त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगावर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. नागपूरशी असलेले त्यांचे नाते आणि आदिवासी समाजातील कार्य लक्षात घेऊन भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्रातील सात राज्यसभा सदस्यांची मुदत संपत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान, काँग्रेसकडून रजनी पाटील, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी, भाजपकडून धैर्यशील पाटील आणि भागवत कराड, तसेच रामदास आठवले यांची मुदत संपत आहे. त्यामुळे या सात जागांसाठी ही निवडणूक होत आहे.



