बारामती : वृत्तसंस्था
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून १ जानेवारी २०२६ पर्यंत नाव नोंदविलेल्या मतदारांना मतदानाचा अधिकार असणार आहे. १० मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर निवडणुकीची अधिकृत घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार या बारामतीतून उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचे समजते. ही निवडणूक शक्यतो बिनविरोध व्हावी, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रारूप मतदारयादी १० मार्चला जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ही बैठक प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी पार पडली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच कोअर कमिटीचे अन्य सदस्य उपस्थित होते. तसेच २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसंदर्भातील राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीची तयारीही सुरू असल्याचे समजते. वरळी डोम येथे होणाऱ्या या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पक्ष संघटनेत मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.
अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे त्यांचा शपथविधी पार पडला. राज्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच एका महिलेने उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्याने हा क्षण ऐतिहासिक मानला जात आहे.
भारतीय संविधानातील कलम १६४(४) नुसार, एखादी व्यक्ती विधिमंडळाची सदस्य नसतानाही मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून नियुक्त होऊ शकते; मात्र सहा महिन्यांच्या आत त्या व्यक्तीने विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्यत्व मिळवणे आवश्यक असते. अन्यथा पदाचा राजीनामा द्यावा लागतो. या संवैधानिक अटीची पूर्तता करण्यासाठी सुनेत्रा पवार यांची बारामती पोटनिवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. एकूणच बारामती पोटनिवडणूक, राज्यसभा उमेदवारी आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीच्या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चुरस निर्माण झाली आहे. अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



