लाईव्ह महाराष्ट्र न्युज वृत्तसंस्था : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात लग्नसमारंभादरम्यान झालेल्या भीषण हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय गोसावी यांच्या मुलीचा विवाहसोहळा सुरू होता. हळदीच्या कार्यक्रमासाठी नातेवाईक मोठ्या संख्येने जमले होते. साखरपुड्यापूर्वी साक्री व सोनगड येथून आलेल्या काही नातेवाईकांमध्ये जुन्या वादावरून बाचाबाची झाली. सोशल मीडियावर प्रसारित आक्षेपार्ह संदेश व व्हिडिओ यावरून आधीपासून तणाव असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वाद चिघळल्याने काही जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेत देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (वय ३५), सुरेशगीर मोजगीर गोसावी (वय ५५) व साहिल सुरेश गोसावी (वय २२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पंकज अशोक गीर, सुरेश सुपडू गीर व सागर गोसावी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी कानागिरी मुलागिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिल गिरी हटुगिरी गोसावी, सोनुगिरी गोसावी, विजुगिरी हटुगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभू गिरी गोसावी व हर्षु शंभू गोसावी यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी लग्नसोहळ्याचे मंगल वातावरण होते, तेथे आता शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे.



