नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अन्नदात्यासाठी केंद्र सरकारकडून दिलासादायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर असून, यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत तीन टप्प्यांत, प्रत्येकी दोन हजार रुपये अशा स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी वितरित करण्यात आला होता. त्यानंतर आता शेतकरी २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून हा हप्ता ४ मार्च २०२६ पर्यंत, म्हणजेच होळीच्या सणापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाण्याची शक्यता आहे. अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यावेळी काही शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजारांऐवजी चार हजार रुपये जमा होणार आहेत. तांत्रिक कारणांमुळे किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ज्यांना २१ वा हप्ता मिळाला नव्हता, अशा शेतकऱ्यांना थकीत आणि चालू हप्ता मिळून एकूण चार हजार रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही, त्यांचा २२ वा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी त्वरित पीएम-किसान पोर्टलवर जाऊन आपली माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



