मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात असतानाच, अपघातापूर्वी अजित पवार यांनी केलेल्या शेवटच्या फोन संभाषणाची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी विमानातून शेवटचा फोन त्यांचे चुलत पुतणे श्रीजीत पवार यांना केला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात अजित पवार यांनी साधलेला हा शेवटचा फोन संवादाची ऑडिओ क्लिप उपस्थितांना ऐकवण्यात आली.
श्रीजीत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माळी समाजातील उमेदवार देण्यात न आल्याबाबत त्यांनी अजित पवार यांच्याकडे चर्चा केली होती. त्यावर अजित पवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत, “आपण सगळ्याच जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालतो,” असे ठामपणे सांगितले.
श्रीजीत पवार यांनी पुढे सांगितले की, त्यांनी अजित पवार यांना एक मेसेज केला होता. तो मेसेज पाहिल्यानंतर अजित पवार यांनी थेट विमानातूनच फोन केला. त्या संभाषणात ते म्हणाले, “तुम्हाला काही माहिती नसतं… बाळा, आपण सगळ्या जाती-धर्मांना सोबत घेऊन जातो. सुप्यात माळी समाजाला उमेदवारी दिली आहे. इतर ठिकाणीही ओबीसी उमेदवारांना संधी दिली. इतर पक्षांनी ती दिलेली नाही.”
या ऑडिओ क्लिपवरून अजित पवार यांची पक्षसंघटना, कार्यकर्ते आणि सामाजिक समतोल यांना दिलेले महत्त्व स्पष्ट होते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, अर्थ खाते वगळता तीन महत्त्वाची खाती त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. तसेच पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांना देण्यात आले आहे.



