पुणे : वृत्तसंस्था
पुण्यातील मुंढवा परिसरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आर्थिक गुन्हे विभागाने (ईओडब्ल्यू) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, या कारवाईमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मात्र, सादर करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात फक्त शीतल तेजवानी यांचेच नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या प्रकरणात याआधी चर्चेत असलेली दिग्विजय पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांची नावे 1886 पानी विस्तृत चार्जशीटमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या टप्प्यावर या दोघांना दिलासा मिळाल्याची चर्चा सुरू असून, तपासाच्या दिशेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
मुंढवा येथील संबंधित जमीन व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये पार्थ पवार यांचेही नाव याआधी समोर आले होते. मात्र, प्रत्यक्ष आरोपपत्रात त्यांचा उल्लेख नसल्याने तपास यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दिग्विजय पाटील यांचाही आरोपपत्रात उल्लेख नाही.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. त्यानंतर लगेचच ईओडब्ल्यूकडून आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी शीतल तेजवानी यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानत त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे.
या घडामोडींनंतर अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “महाराष्ट्र हा केवळ राजकीय दलालीचा अड्डा झाला आहे का? कायदा फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी नमूद केले की, शीतल तेजवानी यांनी एसपी सिव्हिल सूट क्र. 2213/2025 दिग्विजय पाटील यांच्याविरोधात दाखल करत जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे, तर दिग्विजय पाटील यांनी एसपी सिव्हिल सूट क्र. 2347/2025 शीतल तेजवानी यांच्याविरोधात दाखल केला आहे.
दमानिया यांनी पुढे सांगितले की, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी 8 डिसेंबर 2025 रोजी हा जमीन व्यवहार अवैध ठरवून तो रद्द करण्यात यावा, यासाठी अर्ज केल्याची नोंद आहे. “असे असताना पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार? कशी देणार? हा व्यवहार गुंडाळून टाकला जाणार का?” असे सवालही त्यांनी उपस्थित केले. दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी ईओडब्ल्यूच्या कारवाईवर टीका करत, “आरोपपत्र फक्त शीतल तेजवानीवरच दाखल झाले आहे. मग दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्यावरील चौकशीचे काय?” असा प्रश्न उपस्थित केला. “हा न्याय नाही, ही न्यायाची थट्टा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
एकीकडे ईओडब्ल्यूने मोठ्या प्रमाणावर तपास करत विस्तृत चार्जशीट दाखल केली असली, तरी त्यामधील आरोपींच्या नावांवरून आणि काही चर्चेत असलेल्या नावांच्या अनुपस्थितीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील पुढील सुनावणी आणि न्यायालयीन प्रक्रियेत आणखी कोणते खुलासे होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



