मुंबई : वृत्तसंस्था
मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार, या प्रश्नावरून महायुतीतील अंतर्गत राजकारण तापले असून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात उघड रस्सीखेच सुरू झाली आहे. शिंदे गटाने मुंबईत अडीच-अडीच वर्षांचा महापौरपदाचा फॉर्म्युला मांडत भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असताना, भाजपने थेट शिंदे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे महापालिकेच्या महापौरपदावर दावा सांगून राजकीय पलटवार केला आहे.
सध्या ठाणे महापालिकेत शिंदे गटाचे बहुमत असले तरी सत्ता टिकवण्यासाठी भाजपची साथ आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्याच्या महापौरपदावर भाजपचा हक्क असल्याचा ठाम दावा केला आहे.
डावखरे म्हणाले, “ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला बहुमत मिळाले असले तरी भाजपचा सन्मानही तितकाच महत्त्वाचा आहे. शीळ–वडवली पट्ट्यात भाजपने अत्यंत प्रभावी कामगिरी केली असून आमच्या वाट्याला आलेल्या सर्व जागांवर १०० टक्के स्ट्राईक रेट आहे.”
ते पुढे म्हणाले, “भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेचा महापौर किमान दोन वर्षांसाठी भाजपचा असावा, ही आमच्या कार्यकर्त्यांची स्पष्ट मागणी आहे. अन्यथा सत्तेत सहभागी न होता विरोधी बाकावर बसणे आम्हाला मान्य आहे.”
डावखरेंच्या या इशाऱ्यामुळे शिंदे गटाची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मुंबईतील महापौरपदाच्या मुद्यावर भाजपने ठाकरे गटाशीही पडद्यामागे चर्चा सुरू केल्याचा दावा केला जात आहे. शिंदे गटाच्या दबावतंत्राला उत्तर देण्यासाठी भाजपने ही रणनीती आखल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
या संदर्भात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा दावा स्पष्टपणे फेटाळला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, २०१७ साली महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप गैरहजर राहिल्यामुळे ठाकरे गटाचा महापौर निवडून आला होता. त्याच मदतीची ‘परतफेड’ म्हणून यंदा ठाकरे गट भाजपला अप्रत्यक्ष मदत करेल, अशी चर्चा होती. मात्र दोन्ही पक्षांनी ही शक्यता फेटाळल्याने या चर्चेला सध्या पूर्णविराम मिळाला आहे.



