मुंबई : वृत्तसंस्था
महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईच्या महापौरपदावरून सुरू झालेल्या चर्चेत आता भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सूचक विधानावर जोरदार टीका करताना राणे यांनी, “ज्यांच्याकडे संख्याबळ नाही, त्यांचा महापौर काय आकाशातून पडणार का?” असा खोचक सवाल उपस्थित केला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंना केवळ ७२ जागांवर समाधान मानावे लागले. मात्र महापौरपदाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी, “देवाच्या मनात असेल तर आमचाच महापौर होईल” असे सूचक विधान केले होते. यावरूनच राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
या विधानावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे सध्या देवावर विसंबून राहत आहेत. पण देवाला त्यांनी आतापर्यंत कधीच जोडले नाही. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत आहे. मग ठाकरे गटाचा महापौर कसा होणार? एकदा तरी संख्याबळ तपासून पाहावे.”
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीवरही नारायण राणेंनी निशाणा साधला. “दोन्ही ठाकरे बंधू आधी एकत्र होते, तेव्हा काही करू शकले नाहीत. वेगळे झाल्यावरही काही साध्य झाले नाही. आता पुन्हा एकत्र येऊनही काहीच करता आलेले नाही. शिवसेना आता फक्त नावापुरती उरली आहे,” अशी टीका त्यांनी केली.
राज्याच्या एकूण राजकीय स्थितीवर भाष्य करताना राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेले आहेत. ते जे बोलतात, त्याला वास्तवाचा आधार नाही. भाजप–शिंदे शिवसेना युतीची महाराष्ट्रातील जवळपास २५ महानगरपालिकांमध्ये सत्ता आली आहे. त्यामुळे आता तरी शहाणपणाने घरी बसावे आणि आवश्यक ते उपचार करून घ्यावेत,” असा बोचरा सल्लाही त्यांनी दिला. महापौरपदावरून सुरू झालेल्या या शब्दयुद्धामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, पुढील काळात या वादाला आणखी धार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



