मुंबई : वृत्तसंस्था
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. “आमच्या पक्षाचे नुकसान होत असतानाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जागा देण्याची भूमिका घेतली,” असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय तडजोडी करताना केवळ पक्षाचा स्वार्थ न पाहता व्यापक राजकीय हिताचा विचार करण्यात आला, असे स्पष्ट करत राऊत म्हणाले की, “शरद पवार आमच्यासोबत असावेत, ही भावना केवळ शिवसेनेची नाही, तर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांची आहे.” यासाठी आम्ही आमच्या हक्काच्या आणि आधीपासून अस्तित्वात असलेल्या ‘सीटिंग’ जागादेखील सोडल्या, असेही त्यांनी नमूद केले. या विधानामुळे महाविकास आघाडीतील जागावाटप आणि अंतर्गत समन्वयावर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर रशीद मामू यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपकडून शिवसेनेवर करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राऊत यांनी भाजपच्या राजकीय धोरणांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जात आहे. निवडणुका जिंकण्यासाठी तत्वं बाजूला ठेवण्यात आली आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच यापूर्वी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, याची आठवण करून देत राऊत म्हणाले की, “आज त्याच नेत्यांसोबत भाजप सत्तेसाठी तडजोड करत आहे. त्यामुळे भ्रष्टाचारावर भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचे स्पष्ट होते.” विरोधकांवर आरोप करायचे आणि सत्तेसाठी त्यांच्याशीच युती करायची, ही भाजपची सवय बनली असल्याचा टोला त्यांनी लगावला.
राज्यातील राजकीय संस्कृतीवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, भाजप सत्तेत आल्यानंतर निवडणुकांमध्ये बंडखोरी वाढली आहे. “पूर्वी निवडणूक लढवणाऱ्या पक्षांची संख्या मर्यादित होती. आज दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी निर्माण झाल्या आहेत. असंतुष्ट नेत्यांना पर्याय उपलब्ध करून दिले जात असून, पैशाच्या जोरावर लोकांना फोडले जात आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
सत्तेचा गैरवापर करून राजकीय तोडफोड केली जात असून त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत अस्थिरता वाढत असल्याचे सांगत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.



