जळगाव : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुतीने ‘मिशन मनपा’साठी अखेर एकत्रित रणनिती निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात झालेल्या गोपनीय चर्चांनंतर जळगाव महापालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढवण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून, जागावाटपाचा ४६-२२-७ असा फार्म्युला ठरल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात काल भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये सखोल चर्चा होऊन महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यावर एकमत झाले. बैठकीस भाजपचे आमदार मंगेश चव्हाण तसेच राष्ट्रवादीकडून राज्याचे माजी मदत व पुनर्वसन मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील उपस्थित होते. त्यामुळे या निर्णयाला वरिष्ठ पातळीवरूनही मान्यता असल्याचे संकेत मिळत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप ४६, शिवसेना (शिंदे गट) २२ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ७ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. यापूर्वी भाजप आणि शिवसेना यांच्यात ५५-२५ अशा जागावाटपावर चर्चा झाली होती. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्याने भाजपला काही पावले मागे घ्यावी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे, मागील महापालिका निवडणुकीत भाजपाने स्वबळावर ५७ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी भाजप ५० पेक्षा कमी जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, एकहाती सत्तेचे गणित यावेळी अवघड ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा चांगला राहिल्याने भाजपाने यावेळी अधिक समंजस भूमिका घेतल्याचेही बोलले जात आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून समविचारी पक्षांना सोबत घेऊन सर्वपक्षीय आघाडीचे आवाहन करण्यात आल्यानंतर महायुतीतील हालचालींना वेग आला. ‘पुणे पॅटर्न’ जळगावात राबविल्यास निवडणूक अधिक तुल्यबळ ठरेल, या मतप्रवाहामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटालाही महायुतीत सामावून घेण्यावर सहमती झाल्याचे समजते.
जरी युती अंतिम टप्प्यात पोहोचली असली तरी जागावाटपाबाबत तीनही पक्षांकडून सध्या गुप्तता पाळण्यात येत आहे. मात्र ४६-२२-७ या सूत्रावरच अंतिम निर्णय होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची ताकद आणि विरोधकांची रणनिती यामुळे जळगावचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आता सर्वांचे लक्ष अधिकृत घोषणेकडे लागले आहे.



