जळगाव : प्रतिनिधी
शेत जमीन विक्री असल्याचे सांगत जमीन मालक म्हणून दुसऱ्याच महिलेला उभी करून भगवान काशिनाथ सोनवणे (४२, रा. शिवाजीनगर) यांची सात लाख ७४ हजार ७८६ रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. खरेदीवेळी हा प्रकार वेंडरच्या लक्षात आल्याने खरेदी-विक्रीचा व्यवहार फसला. हा प्रकार २० जानेवारी ते २८ एप्रिल यादरम्यान घडला. या प्रकरणी २१ नोव्हेंबर रोजी शहर पोलिसात फसवणूक करणाऱ्या राजपूत नाव सांगणारी महिला, असलम खान अशरफ खान (रा. गेंदालाल मिल), हुसेन मर्चट (रा. नंदुरबार), प्रभाकर सुभाष देशमुख (रा. धुळे) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरमधील रहिवासी भगवान सोनवणे यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांच्या ओळखीतील असलम खान अशरफ खान (रा. गेंदालाल मिल) यांनी सोनवणे यांना धरणगाव तालुक्यातील विवरे येथील एक शेतजमीन विक्री असल्याचे सांगितले. व जमीन मालक म्हणून अनसूयाबाई धनलाल शुक्ल नावाच्या एका महिलेची व तिच्या जावयाची भेट घालून दिली.
दरम्यान, नंदुरबार येथील हुसेन मर्चट नामक व्यक्तीने त्या जमिनीचा व्यवहार महिलेने माझ्याशी केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जमीन हवी असल्यास माझ्याशी सौदापावती करावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर हुसेन याला ९९ हजार व नंतर २५ हजार रुपये पाठविले. २८ एप्रिल रोजी धरणगाव येथे नोंदणी कार्यालयात गेले. तेथे वेंडरने कागदपत्रे खोटे असल्याचे व अनसूयाबाई शुक्ल यांना मी ओळखतो, ही ती महिला नाहीत, असे सोनवणे यांना सांगितले. महिलेला विचारणा केली असता तिने तिचे नाव राजपूत असल्याचे सांगितले. त्यावेळी इतर जण पळून गेले.
जागा मालक सांगणाऱ्या महिलेचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बैंक पासबुक व इतर शासकीय कागदपत्रांसह सातबारा उतारा सोनवणे यांनी पाहिला. ते खरे असल्याची खात्री झाली व १० लाख ३० हजारांमध्ये व्यवहार ठरला. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी अनसूयाबाई शुक्ल, असलम खान हे सोनवणे यांच्या घरी आले. मात्र, ते देवदर्शनासाठी गेलेले असल्याने त्यांचे मित्र मयूर अग्रवाल यांच्या नावाने शेतजमिनीची सौदापावती करून ५० हजार ७८६ रुपये बयाना म्हणून दोघांनी घेतले. १० मार्च रोजी त्या महिलेला एक लाख रोख दिले.


