जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी येथील दोन भाऊ शिरसाळा येथे दर्शनासाठी जात असताना चुलत भाऊ दुचाकी अपघातात ठार झाले. वाडी किल्ल्याजवळ शनिवारी सकाळी घडलेली ही घटना दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश समाधान माळी (१७) आणि शुभम भिका माळी (२१, दोघे रा. पाळधी ता. जामनेर) अशी या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. दोघे चुलत भाऊ शनिवारी सकाळी चार वाजता शिरसाळा येथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी पाळधी येथून निघाले. बोदवडकडे जात असताना मालदाभाडी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे दोघे जण रस्त्याच्या कडेला खोल नाल्यात पडले. त्यांना गळा व डोक्याला जबर मार लागला. दोघेही गंभीर जखमी अवस्थेत तिथेच पडून होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास घरातील काही जण व गल्लीतील तरुण त्यांना शोधण्यासाठी निघाले. त्यावेळी वाडी किल्ल्याजवळ रस्त्यावर त्याची दुचाकी आणि दोघे तरुण मृतावस्थेत आढळून आले. रात्री ९ वाजेच्या सुमारास या चुलत भावांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.


