नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा २०१९ ते लोकसभा २०२४ निवडणुकीदरम्यान मतदारांची झालेली वाढ १ हजार ९५२ इतकी होती. मात्र, लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ या पाच महिन्यांच्या कालावधीत ८ हजार ४०० मते वाढली. इतकेच नाही तर, लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी मतदान केले होते, त्यांची व कुटुंबीयांची नावे विधानसभा २०२४च्या निवडणुकीच्या वेळी मतदारयादीमध्ये नव्हती.
मुलाचे आणि वडिलांचे नाव वेगवेगळे असणे, घर क्रमांक शून्य असणे, एकाच व्यक्तीचे नाव शहरातसुद्धा आणि ग्रामीण भागातसुद्धा असल्याचे आढळले. असे दुबार मतदार हे प्रामुख्याने भाजपचेच कार्यकर्ते आहेत, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात सुमारे ३५ हजार ५३५ मतांची चोरी झाल्याचा आरोप करताना भाजपने मध्य प्रदेशमधून कार्यकर्ते आणून मतदान केल्याचा दावाही केला आहे.
मतदार यांद्यांतील घोळ लक्षात आल्यानंतर देशमुख यांनी 13 जणांचा चमू तयार केला होता. या चमूने सुमारे 3 महिने मतदार याद्यांची तपासणी केली व त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असल्याचे देशमुख म्हणाले. भाजप सरकारवर सर्वच जण नाराज होते. त्यामुळे लोकसभेच्या निवडणूकीमध्ये मतदारांनी आपली नाराजी व्यक्त करताना भाजपला आपली जागा दाखवून दिली. मात्र त्यानंतर विधानसभेवेळी अचानक बदल झाल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना, दुबार नोंदणी असलेल्या नागरिकांची यादीच वाचून दाखवली. आमदार चरण ठाकूर यांचे भाऊ दिलीप व मुन्ना ठाकूर यांचीही दोन ठिकाणी नावे आहेत. भाजपचे पदाधिकारी योगेश शेषराव चाफले यांनी जेथून सोयीचे आरक्षण येईल तेथून निवडणूक लढविण्यासाठी आपले नाव हे कोंढाळी नगरपंचायतीमध्ये टाकल्याचा आरोप देखील त्यांनी केला. दुधाळा जिल्हा परिषद सर्कलसाठी काटेपांजरा या गावातही चाफले नाव आहे. मध्य प्रदेश येथील लांगामधील सरपंच वनिता पराडकर व त्यांचे पती उपसरपंच गणपती पराडकर हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांची नावे देशमुख यांच्या काटोलच्या मतदारयादीत आहेत.


