जळगाव : प्रतिनिधी
राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून अनेक तरुण व तरुणीसाठी तलाठी भरतीची परीक्षा घेण्यात आली होती. पण अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्यामुळे तलाठी भरतीची परीक्षा तब्बल दोन तास पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे बाहेर जिल्ह्यातून आलेला विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. जळगाव शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी सकाळी नऊ वाजता तलाठी भरतीचा पहिला पेपर होता. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे हा पेपर साडेअकरा वाजता सुरू झाला. त्यामुळे परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले असून पुढील सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा दुपारी साडेबारा ऐवजी दुपारी अडीच वाजता होणार आहे.
दरम्यान, तलाठी भरती परीक्षेसाठी नंदुरबार तसेच जळगाव-मध्य प्रदेश सीमेवरील आणि विविध जिल्ह्यामधून विद्यार्थी हे वेळेवर दाखल झाले होते. मात्र, या ठिकाणी त्यांना सर्व्हर डाऊनच असल्याचे अडचण सांगून पेपर उशिराने सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.सर्व्हर डाऊन मुळे तब्बल दोन तास ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे रात्री साडेआठ वाजेपर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहेत. त्यामुळे परीक्षा देऊन घरी जाणाऱ्या विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होणार आहे.
परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कुठलीही बसण्याची व्यवस्था नसल्याने उमेदवारांनी प्रचंड रोष व्यक्त केला. तसेच आमचा जो वेळ वाया गेला याला जबाबदार कोण असाही प्रश्न या ठिकाणी तरुण तरुणी तसेच परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांनी उपस्थित केला आहे आहे. एका विवाहितेचा तलाठी भरती परीक्षेसाठी येत असताना रस्त्यात अपघात झाला. मात्र, यानंतरही अपघातग्रस्त चारचाकी जागेवरच सोडून दुसऱ्याची दुचाकी घेऊन त्यांनी वेळेत परीक्षाकेंद्र गाठले. मात्र आता त्यांना या ठिकाणी तब्बल दोन तास उशिराने पेपर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आल्याने यावेळी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.


