जळगाव : प्रतिनिधी
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीसमोरील बंडखोरीचे संकट अद्याप कायम असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नाशिकमधील बंडखोरीचा तिढा सुटल्याच्या पार्श्वभूमीवर जळगावचाही पेच मार्गी लागल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांतच शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या अचानक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा काळे या गुरुवारी सकाळपासून कोणाच्याही संपर्कात नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या जळगाव येथील निवासस्थानीही शांतता असून त्या घरी नसल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यांचे सर्व मोबाईल क्रमांकही बंद येत असल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
नाशिकमधील बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर जळगावमधील बंडखोरीही शमण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील जळगावचा तिढा सुटल्याचे संकेत दिले होते. मात्र, अंतिम टप्प्यात रेश्मा काळे संपर्काबाहेर गेल्यामुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रेश्मा काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. सुरुवातीला नाशिकमधील परिस्थिती लक्षात घेऊन उमेदवारी अर्ज भरल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच नाशिकमधील बंडखोरांनी माघार घेतल्यास आपणही विचार करू, असे संकेत दिले होते. मात्र, अलीकडेच माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भूमिका बदलल्याचे दिसून आले.
“मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि विशेषतः महिला प्रतिनिधींकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी निवडणुकीच्या मैदानात कायम राहावे. त्यांच्या भावनांचा आदर करून आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेईन,” असे त्या म्हणाल्या होत्या. याचबरोबर शेवटपर्यंत लढण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला होता.
जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीने भाजपचे नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून बंडखोरी केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. रेश्मा काळे यांना भाजपमधील काही नगरसेवकांचा छुपा पाठिंबा असल्याचाही दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, गिरीश महाजन यांनी जळगावमधील बंडखोरीचा प्रश्न सुटल्याचे सांगितले असले तरी रेश्मा काळे यांच्या अचानक गायब झाल्यामुळे महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे. त्या उमेदवारी मागे घेणार की अखेरपर्यंत निवडणूक लढवणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असून आता पुढील काही तासांतील घडामोडी निर्णायक ठरणार आहेत.



