मुंबई : प्रतिनिधी
राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीची घोषणा होताच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील राज्यसभा जागेसाठी माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या सलग राजकीय भेटींमुळे उमेदवारीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांनी सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री भेटीनंतर पुन्हा एकदा नवनीत राणा आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.
या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अशी उमेदवारी मिळाल्यास त्यांना भाजपशी असलेले राजकीय समीकरण बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागू शकतो, अशीही चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या जागेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नावही चर्चेत आहे. मात्र उमेदवारीबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पक्षश्रेष्ठी निर्णय घेण्यास विलंब करत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस एखादे धक्कातंत्र वापरणार का, याबाबत राजकीय निरीक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून असल्याने आता शेवटच्या क्षणी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काही तासांत या संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



