मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत हे दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी दाखल झाले. या भेटीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
राज्यात विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून महायुतीने आतापर्यंत ६ जागांवर विजय मिळविला आहे. जळगाव आणि नाशिकमध्ये बंडखोरीमुळे काही ठिकाणी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. महायुतीतच अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत असून महाविकास आघाडी या निवडणुकीत तुलनेने कमकुवत स्थितीत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी कोकणातील विधान परिषद निवडणुकीबाबत गंभीर आरोप केले आहेत. कोकण विभागातील उमेदवारी माघारी घेण्यासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यापैकी १५ कोटी रुपये मुंबईतील बीकेसी परिसरातील एका हॉटेलमध्ये देण्यात आल्याचा सनसनाटी आरोपही राऊत यांनी केला. कोकणातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी संख्याबळ नसल्याने माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. त्याच संदर्भात राऊत यांनी हे आरोप केले.
संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा या घडामोडींशी काही संबंध आहे का, याबाबत मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दोन्ही नेत्यांकडून भेटीबाबत मौन बाळगण्यात आले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानले जातात. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यात राऊत यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. मराठी मतांचे विभाजन टाळण्याच्या उद्देशाने दोन्ही पक्षांमध्ये संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
महापालिका निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेकदा एकत्र दिसले होते. दोघांनी विविध शाखांना भेटी दिल्या तसेच ‘मातोश्री’ आणि ‘शिवतीर्थ’वरील परस्पर भेटीगाठीही वाढल्या होत्या. मात्र निवडणुकीनंतर या आघाडीची तीव्रता कमी झाल्याचे दिसून आले. सध्या ठाकरे बंधूंच्या राजकीय समीकरणांबाबत शांतता असतानाच संजय राऊत यांच्या या अचानक भेटीमुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.
राज ठाकरे यांनीही विधान परिषद निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे शिवतीर्थावरील या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्यातील बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेता या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.



