नागपूर : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी नागपुरात झालेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमावरून राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शास्त्री यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतरही त्यांचे कार्यक्रम सुरू ठेवण्यात येत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नागपुरातील कार्यक्रमादरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते, असा दावा केला. या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी शास्त्रींवर टीकेची झोड उठवली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, “सत्तेतल्या एका मोठ्या पक्षाला वगळता संपूर्ण महाराष्ट्राने या भोंदूगिरीचा निषेध केला आहे. तरीही नागपुरात या कार्यक्रमांना परवानगी दिली जात आहे, हे लाजिरवाणे नाही का?” त्यांनी असा सवाल उपस्थित करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“महाराष्ट्र ही संतांची आणि महामानवांची भूमी आहे. अशा भूमीत बाहेरून भोंदू लोकांना बोलावण्याची गरज काय?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आरोप केला की, सत्ताधारी पक्षाकडून अशा कार्यक्रमांना पाठबळ दिले जात आहे. “महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा कोणताही भोंदू मोठा नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी सरकारने तत्काळ हस्तक्षेप करून हा कार्यक्रम बंद करावा आणि पुढे अशा व्यक्तींवर बंदी घालावी, अशी मागणी केली.
रोहित पवार यांनी धीरेंद्र शास्त्री यांनी दिलेल्या माफीनाम्यावरही संताप व्यक्त केला. “वारंवार चुकीची विधाने करायची, जनतेचा रोष ओढवला की माफी मागायची आणि पुन्हा तेच करायचे, ही एक प्रवृत्ती आहे. अशा प्रवृत्तींना आम्ही विरोध करणारच,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, शास्त्री यांनी यापूर्वी संत तुकाराम यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले होते. “आता छत्रपतींचा आणि महिलांचा अपमान केला जात आहे. माध्यमांनी त्यांचे वक्तव्य जसाच्या तसे दाखवले आहे, त्यामुळे माफी ही केवळ दिखावा असल्याचे स्पष्ट होते,” असा आरोप त्यांनी केला.
“महाराष्ट्रात संतांविषयी प्रचंड आदर आहे. मात्र, संतांचा आव आणून जर कोणी महापुरुषांचा अपमान करत असेल, तर महाराष्ट्र त्याला योग्य उत्तर देईल,” असे सांगत त्यांनी संत तुकारामांच्या उक्तीचा संदर्भ देत कठोर इशाराही दिला.
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून, श्रद्धा, इतिहास आणि राजकारण यांच्या संगमावरून निर्माण झालेला हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.



