जिल्ह्यात आजपर्यंत एकही “टँकर” र सुरु नाही – केवळ १४ विहिरी अधिग्रहित – नागरिकांना दिलासा
जळगाव : प्रतिनिधी
पाणीपुरवठा व वीज ही मुलभूत व अत्यावश्यक सेवा असून, उन्हाळ्याच्या काळात कोणत्याही परिस्थितीत पाणी व वीजपुरवठा खंडित होऊ नये. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून नागरिकांना अखंडितपणे सेवा द्यावी,” असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात जिल्ह्यातील पाणीटंचाई व महावितरण कडील विविध विषयांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील, आमदार अमोल जावळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उपमहापौर मनोज चौधरी तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहरात व ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजनांच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरणने विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले. अत्यावश्यक परिस्थितीत पाणी व वीज खंडित करावी लागल्यास जिल्हाधिकारी यांना पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या भागांमध्ये वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जलजीवन मिशनअंतर्गत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे अधिकारींनी त्याठिकाणी जाऊन त्याचे तात्काळ निराकरण करावे, महावितरणकडील वीज जोडणीअभावी काही पाणीपुरवठा योजना रखडल्या असल्याचे निदर्शनास आणून देत त्या तातडीने सुरू करण्याचे निर्देश देऊन अनधिकृत पाणी उपसा होत असल्यास अशा ठिकाणी पाणी मोटर कनेक्शन तात्काळ बंद करावे असे निर्देशित पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
नगरपालिका व नगरपंचायत स्तरावरील विकासकामांमध्ये दर्जा राखण्यावर भर देत अत्यल्प दरात कामे घेतल्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे नमूद करून संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात केले. जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांची अपुर्ण कामे तात्काळ पुर्ण करण्याच्या सूचना ही पालकमंत्र्यांनी दिल्या.
वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले, भुसावळ औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना वीज पुरवठा संदर्भात अडचणी आहेत विजेच्या अडचणीमुळे त्यांच्या उत्पादनावर परिणाम होत असून या संदर्भात महावितरण ने या भागातील विजेचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशा सूचना त्यांनी दिल्यात.भुसावळ तालुक्यातील अमृत योजना टप्पा एक व दोन ची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत, भुसावळ शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता पाणीपुरवठाच्या योजनांची अपूर्ण कामे पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांनी या भागातील पाणीपुरवठा योजना महावितरण प्रलंबित कामे यांचा आढावा घेतला.
बैठकीत आमदार अनिल पाटील आमदार चंद्रकांत सोनवणे, अमोल जावळे व जिल्ह्यातील नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष यांनी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित पाणीपुरवठा, वीज पुरवठा योजना संदर्भात सूचना मांडल्या.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये मागील तीन वर्षांत समाधानकारक पर्जन्य नोंदविला गेला असून 2023 मध्ये 100 टक्के, 2024 मध्ये 110 टक्के तर 2025 मध्ये 113 टक्के पाऊस झाला आहे. येत्या वर्षातही 96 ते 100 टक्के पर्जन्य होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. सध्या हतनूर, गिरणा व वाघूर या प्रमुख प्रकल्पांसह जिल्ह्यात सुमारे 47 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या कृती आराखड्यामुळे यंदा एप्रिल पर्यंत टँकरची आवश्यकता भासलेली नाही. 14 ठिकाणी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 26 योजनांपैकी 13 योजना पूर्ण झाल्या असून उर्वरित योजना अंतिम टप्प्यात आहेत. असे त्यांनी सांगितले.
या आढावा बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी, महावितरण, पाणीपुरवठा, जलसंपदा आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी आभार मानले.



