चोपडा : प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी रामपुरा भागात गोरक्षक आणि पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर बुधवारी सकल हिंदू समाजातर्फे शहरात मोर्चा काढण्यात आला. पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या निलंबनाची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. ‘गोमाता वाचवा’ आणि ‘दोषींवर कारवाई करा’ अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. गांधी चौकापासून सुरू झालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेत रूपांतरित झाला, ज्यात सुमारे ५ हजार नागरिक सहभागी झाले होते.
शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संजय शर्मा म्हणाले, संविधानाला न मानणाऱ्या आणि गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पीआय साळवे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. कत्तलखाने चालवणाऱ्यांना पाठबळ देणाऱ्या पोलिसांना आता हिंदू समाज सोडणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला. या महामोर्चात गुजरातच्या नेहाबेन पटेल (प्राणी फाऊंडेशन), आडगावचे संत महाहंसजी महाराज, हभप सुशील महाराज, पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, महिला, तरुण सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी आंदोलकांनी रोष व्यक्त केला.
साळवे यांच्यावर कारवाईसाठी आंदोलक ठाम होते. अशा यावेळी रोहित निकम यांनी मंत्री गिरीश महाजन आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करत आंदोलकांची थेट चर्चा घडवून आणली. ‘या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ५ दिवसांचा वेळ द्यावा,’ असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतले.



