बीड : वृत्तसंस्था
परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांचे नाव लाच प्रकरणात समोर आल्यानंतर महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. सालंसी (ऐपत) प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल ५० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कडे करण्यात आली होती. तक्रार दाखल होताच एसीबीने प्राथमिक पडताळणी करून नियोजनबद्ध सापळा रचत कारवाई केली.
तक्रारीनुसार, सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. पुढे तडजोडीनंतर २० हजार रुपयांवर व्यवहार ठरल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सापळ्याच्या कारवाईवेळी तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले जात आहे. तरीदेखील एसीबीने आवश्यक पुरावे संकलित केले असून, संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.ही कारवाई सोपान चिट्टमपल्ले, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास बीड एसीबीकडून सुरू आहे.
या कारवाईमुळे परळी तालुक्यातील महसूल विभागात धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हाभर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाबाबत नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. सामान्य नागरिकांकडून भ्रष्टाचाराविरोधातील या धडक कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर राज्यभर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत, बीड जिल्ह्यातील काही अधिकारी त्यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा दावा केला होता. त्या अधिकाऱ्यांच्या यादीत व्यंकटेश मुंडे यांचे नाव असल्याचीही चर्चा झाली होती.
भगवान बाबांच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा दुरुपयोग करून काही राजकीय नेते व वाल्मिक कराड यांसारखी मंडळी समाजाची बदनामी करत असल्याचा आरोपही दमानिया यांनी केला होता. तसेच परळी येथे विशिष्ट समाजातील व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवर नेमल्याचा आरोप त्यांनी केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर तहसीलदारांविरोधातील एसीबीची कारवाई अधिक चर्चेचा विषय ठरली आहे. प्रकरणातील पुढील घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, महसूल प्रशासनातील शिस्त आणि पारदर्शकतेबाबत काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.



