मुंबई : वृत्तसंस्था
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आता राज्याचे राजकारण तापले आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल चढविला आहे. पहलगाम हल्ला हा केंद्र शासनाचे अपयश आहे. आजवर केंद्र शासनाकडून काश्मीर अत्यंत सुरक्षित आहे. दहशतवादी घटना संपुष्टात आल्या आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र शासनाचे सर्व दावे पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पोकळे ठरले आहेत. ज्या ठिकाणी हल्ला झाला तेथे कोणतीही सुरक्षा यंत्रणा नव्हती याचे आश्चर्य वाटते. याचा अर्थ आपली यंत्रणा किती गाफील आहे हे स्पष्ट होते. पहलगाम दहशतवादी हल्ला विषयावर राजकारण न करता ठोस पावले उचलली जावी. हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण आहे? याचा शोध घेतला पाहिजे. संबंधित दहशतवाद्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
जयंत पाटील म्हणाले की, दहशतवादी सहजपणे मोठ्या संख्येने पर्यटक असलेल्या ठिकाणी पोहोचतात. निरपराध आणि बेसावध पर्यटकांवर हल्ला करतात, हे सर्व धक्कादायक वाटते. लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांना सीमेहून देशाच्या आताली भागात 300 किलोमीटर अंतरापर्यंत देखील हल्ला होऊ शकतो, याचा अंदाज असायला हवा होता.
जयंत पाटील म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 400 पारची घोषणा करणाऱ्या भाजपला 250 जागांचाही आकडा गाठता आला नाही. परिणामी नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू आणि अन्य लोकांना सोबत घेऊन भाजपला केंद्रात सत्ता स्थापन करावी लागली. तर, नोव्हेंबर 2024मधील विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठे बहुमत मिळाले. इतके की त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्या मित्र पक्षांचीही गरज वाटली नाही. एकंदरीत काय तर केंद्रात आणि राज्यात दोन्ही एकाच विचारांचे सरकार आले. त्यामुळे आपल्या राज्याचे चित्र वेगळे असायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही. आज आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र मागे पडत आहे, कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट आहे, भ्रष्टाचारात महाराष्ट्र पुढे आहे, राज्यात धार्मिक द्वेष पसरवला जातो आहे. राज्याची अशी परिस्थिती कधीच नव्हती.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी पुण्यातील दोन कुटुंबांची शरद पवारांनी गुरुवारी सकाळी भेट घेतली. तेव्हा मृत संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरीने हल्ल्याची तपशीलवार माहिती दिली. माझ्या वडिलांना हिंदू म्हणून गोळ्या घातल्या, असे तिने शरद पवारांना सांगितले. दुसरे मृत कौस्तुभ गनबोटेंच्या पत्नी संगीता म्हणाल्या की, अतिरेकी हिंदूंना टार्गेट करत असल्याचे पाहून आम्ही महिलांनी कपाळावरील टिकल्या काढून फेकल्या. तरीही अतिरेक्यांनी आमच्या कपाळावरील कुंकू पुसले. मात्र, शरद पवारांनी शुक्रवारी असे सांगितले की, अतिरेक्यांनी हिंदू म्हणून गोळ्या घातल्याबाबतचे सत्य मला माहिती नाही. पवारांच्या पक्षाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही असेही म्हटले आहे की, ‘अतिरेक्यांनी हिंदू म्हणून गोळ्या घातल्या याचा पुरावा उपलब्ध नाही.’ दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांना सल्ला दिला आहे की, ज्यांचे नातेवाईक हल्ल्यात मारले गेले, त्यांना भेटून पवारांनी त्यांचे म्हणणे ऐकावे.