मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीचे सरकार असतांना शिंदेंचे आ.संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर अक्षेपार्ह विधान केल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर संतापले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना कडक शब्दात समज द्यावी, अशी तंबी दिल्यानंतर आमदार संजय गायकवाडच्याविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, गुन्हा दाखल झाला आहे तर त्याला मी सामोरे जाईल. मी केलेल्या वक्तव्यात महाराष्ट्र पोलिसांचा चुकून उल्लेख झाला. मला ते स्थानिक पोलिसांबद्दल बोलायचे होते. महाराष्ट्र पोलिसांचे धाडस, कर्तृत्व विसरता येणार नाही. ज्या चांगल्या अधिकाऱ्यांना माझ्या वक्तव्याबद्दल मनस्ताप झाला असेल, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करत आहे. मात्र, काही लोकांमुळे पोलीस बदनाम झाले आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल बोललेले शब्द मी मागे घेत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाच्या ‘आभार यात्रे’साठी रविवार 27 रोजी बुलढाणा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आमदार गायकवाड यांनी शुक्रवारी त्यांच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस खात्याविषयी अपशब्दाची मुक्ताफळे उधळली होती.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही, असे वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांनी केले आहे. तसेच पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात, असा आरोप करत महाराष्ट्र पोलिसांवर थेट आरोप केले आहेत.
संजय गायकवाड म्हणाले की, सरकारने जर एखादा कायदा बनवला तर पोलिसांना एक हप्ता वाढून जातो. गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, जर पोलिसांनी ठरवले की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही, तर सगळे सुतासारखे सुरळीत होईल, असे गायकवाड म्हणाले.
पुढे पत्रकारांशी बोलताना पत्रकारांनी संजय गायकवाड यांच्या मुलाला आलेल्या धमकीबद्दल विचारले. त्यावर बोलताना ते म्हणाले, माझ्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाच्या पहाडाला पार करावे लागेल. पोलिस काहीही करू शकत नाहीत. माझ्या घरासमोर माझी गाडी जळाली कुठेही तपास झाला नाही. त्यामुळे पोलिस हे अकार्यक्षम असून बुलढाण्यातील दोन पोलिस हे चोरांचे सरदार असून चोरीचा माळ पोलिसांच्या घरात आढळतोच कसा? असा सवाल उपस्थित केला आहे.