नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील कैसरगंजचे भाजपचे माजी खासदार ब्रजभूषण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी “जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना रामलल्लाचे दर्शन घेऊ देणार नाही,” असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. ब्रिज भूषण यांनी एका सार्वजनिक व्यासपीठावरून हा इशारा दिला आहे. याविषयी बोलताना,”राज ठाकरे उत्तर भारतीयांना कचरा समजत होते आणि त्यांना मारहाण करत होते. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उन्नावच्या भाजप खासदार साक्षी महाराज यांच्या होळी मिलन समारंभात माजी खासदार ब्रजभूषण शरण सिंह उपस्थित होते. ज्याठिकाणी त्यांनी लोकांना संबोधित केले आणि राज ठाकरेंना इशारा दिला. सिंह म्हणाले, “मला आठवते जेव्हा जेव्हा राज ठाकरे महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना मारहाण करायचे तेव्हा काँग्रेस पक्ष त्यांना सुरक्षा देत असे. जेव्हा आमचे उत्तर भारतीय जे मजूर म्हणून काम करायला गेले होते, मुलाखती द्यायला गेले होते तेव्हा ते गरिबांना मारहाण करायचे आणि काँग्रेस सरकार त्यांना सुरक्षा देत असे.” असे त्यांनी म्हटले.
म्हणूनच जेव्हा त्यांनी (राज ठाकरे) सांगितले की, आम्हाला अयोध्येला जायचे आहे. मला रामजीला भेटायचे आहे. अयोध्या सर्वांची आहे.. ती आपलीही आहे.. ती प्रत्येक गरिबाची आहे, ती राज ठाकरेंचीही आहे. आज, देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि अगदी देशाबाहेरूनही लोक तिथे भेट देण्यासाठी येतात. कुठेही कोणाचाही विरोध नाही. पण, मी राज ठाकरेंना विरोध केला होता. मी काहीही मागितले नाही, मी फक्त एवढेच म्हटले की, त्यांनी महाराष्ट्राच्या मातीत आपल्या सुशिक्षित तरुणांना आणि गरिबांना मारण्याचे काम केले आहे. तुम्ही उत्तर भारतीयांना कचरा समजत होता.
ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना इशारा देत , “तुम्ही अयोध्येत या.. पण जोपर्यंत ते येथील गरीब, महिला आणि तरुणांची जाहीरपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांना अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेऊ देणार नाही.” असे म्हटले आहे. २०२२ च्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण तरीही त्यांना ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यानंतर ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलला.