मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील नागपूर शहरात दंगलीची घटना घडली होती. यात अनेकांचे मोठे नुकसान झाले होते त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरातील दंगलीचा आढावा घेतला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचा निश्चय व्यक्त केला. नागपूर दंगलीत झालेल्या नुकसानीची भरपाई दंगेखोरांकडून केली जाईल. विशेषतः त्यांनी पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकून त्याची भरपाई केली जाईल, असे ते म्हणाले. या दंगलीसंबंधी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांना दंगलखोरांसोबत सहआरोपी करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी आज नागपूरमध्ये घडलेल्या घटनेचा आढावा मी नागपूरच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घेतला. एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सगळ्या गोष्टींचा हा आढावा होता. मुळातच काही गोष्टी मी सभागृहातही स्पष्ट केल्यात. त्यानुसार, औरंगजेबाची एक प्रतिकात्मक कबर सकाळी जाळण्यात आली. त्यानंतर काही लोकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण त्यानंतर कबर जाळताना पवित्र कुराणमधील आयती लिहिलेली चादर जाळल्याची अफवा पसरली. काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार केला. त्यानंतर सायंकाळी जमाव जमला. या जमावाने तोडफोड केली, जाळपोळ केली, गाड्या फोडल्या. लोकांवर हल्ले केले. पोलिसांनी 4-5 तासांतच स्थिती नियंत्रणात आणली. त्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या असतील किंवा इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी करायची गरज होती त्या सर्व गोष्टींचा वापर पोलिसांनी केला.
या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होते त्याच्यासह खासगी लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये केलेले चित्रिकरण व पत्रकारांच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 104 लोकांची आतापर्यंत ओळख पटली आहे. त्यापैकी 92 जणांना अटक करण्यात आली आहे. 12 जण 18 वर्षांखालील असल्यामुळे त्यांच्यावर संबंधित कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. ओळख पटवण्याची कारवाई अजून सुरू आहे. याहून अधिक लोकांना अटक केली जाणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, एखादा व्यक्ती दंगल करताना दिसतो, दंगेखोरांना मदत करताना दिसतो, त्या सर्वांवर पोलिस कारवाई करतील. यात कुणालाही सोडले जाणार नाही. विशेषतः सोशल मीडियाचे मोठ्या प्रमाणात ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा तिचा प्रसार व्हावा म्हणून पोस्ट केल्या, त्या सर्वांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी केले जाणार आहे. कारण, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दंगल भडकवण्यासाठी मदत केली. जवळपास 68 पोस्टची आत्तापर्यंत ओळख पटवून डीलिट करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली आहे. अजून काही पोस्टची माहिती घेणे चालू आहे. अशा प्रकारे ज्या लोकांनी दंगल भडकवण्यासाठी पॉडकास्ट केले, ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून लोकांमध्ये एक पॅनिक तयार केली. अशा सर्व लोकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई होईल.
ते म्हणाले, ज्या लोकांचे नुकसान झाले, काहींच्या गाड्या फुटल्या, काहींच्या अंशतः फुटल्या, त्या सर्वांना येत्या 3-4 दिवसांत नुकसान भरपाई दिली जाईल. आत्ता जे काही निर्बंध घातले आहेत, त्या निर्बंधांमुळे जनजीवन व व्यापारावर परिणाम होत आहे. त्यामुळे त्यात लवकरात लवकर शिथीलता आणावी असा प्रयत्न आहे. पण त्याचवेळी पोलिस सजग राहणार आहेत. कुणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला, तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल. आत्ता जे काही नुकसान झाले आहे, ते सर्व नुकसान दंगेखोरांकडून वसूल केली जाईल. त्याची सगळी किंमत काढली जाईल. ती दंगेखोरांकडून वसूल केली जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल.