जळगाव : प्रतिनिधी
भुसावळ शहरातील मुकेश भालेराव या सराईत गुंडाची हत्या करून त्याचा मृतदेह तापी नदीच्या जवळ पुरून टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२१) सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. चार दिवसांपूर्वी त्याला काही तरूण त्याला घरातून घेऊन गेले होते. तेव्हापासून तो बेपत्ता होता. ही हत्या टोळीयुध्दातून हत्या झाली असल्याची संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश प्रकाश भालेराव ( वय ३१, रा. टेक्नीकल हायस्कूल मागे भुसावळ ) याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, लुटमार, धमकी, खंडणी आदींचा समावेश होता. यावर प्रशासनाने त्याला नाशिक येथे स्थानबध्द देखील होता. यातून बाहेर आल्यानंतर तो भुसावळ येथेच वास्तव्याला होता.
सुमारे चार दिवसांपूर्वी त्याला काही तरूणांनी घरातून नेले होते. तेव्हापासून तो बेपत्ता होता. याप्रकरणी त्याच्या पत्नीने पोलिसांत तक्रारही दिली होती. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता शुक्रवारी (दि.२१) सायंकाळी सातच्या सुमारास मुकेश भालेराव याचा खून करून त्याचा मृतदेह तापी नदीच्या बाजूला असलेल्या भागात पुरून टाकण्यात आल्याची माहिती पोलिसांना सुत्रांकडून मिळाली. त्यानंतर धाव घेत पोलिसांनी त्याचा मृतदेह तेथून बाहेर काढला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून याप्रकरणी अज्ञातांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश प्रकाश भालेराव याची टोळी असून त्यांच्यावर तब्बल २६ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याची हत्या टोळीयुध्दातून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या खुनामुळे भुसावळात मध्यंतरी बंद झालेले टोळी युध्द पुन्हा सुरू झाले की काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.