मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला गेल्या काही महिन्यापासून गळती सुरु असतांना आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरून शिंदे गटाचे नेते व जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मोठे विधान केले आहे. उद्धव साहेबांना हिऱ्यासारखे आपले लोक होते ते सांभाळता आले नाही, हे दुर्दैव आहे, असे अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.
राजन साळवी यांचा पक्षप्रवेशावर अर्जुन खोतकर म्हणाले, उद्धव साहेबांना सोडून जाण्याचा प्रश्न नाही. त्यांनी विचारधारा बदलली आहे. शिवसेनाप्रमुखांचे आम्ही शिवसैनिक आहोत. शिवसेनाप्रमुख गेल्यानंतर हीच कमान उद्धव ठाकरे यांच्या हातात आली होती. परंतु उद्धव साहेबांना हे जे हिऱ्यासारखे आपले लोक होते ते सांभाळता आले नाही, हे दुर्दैव आहे. उद्धव ठाकरे यांना सोडून जाताना एकनाथ शिंदे असतील किंवा मी असेल आम्हाला दुःख झालेच आहे. आम्ही काय आनंदाने थोडी गेलो होतो किंवा शिंदे साहेब थोडी आनंदाने गेले.
पुढे बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले, शिवसेनेत एक चांगली गोष्ट घडली आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे नेत आहोत. त्यामुळे साहजिकच अशा सर्व लोकांना शिवसेना सोडताना त्रासच होणार आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले, आता सूचना देऊन काय फायदा आहे. आता पाणी वाहून गेलेला आहे. आता काही होणार नाही. डॅमेज कंट्रोलच्या बाहेर या सर्व गोष्टी गेलेल्या आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच आता ज्याला जायचे त्यांनी जा, असे म्हटले आहे. म्हणजे त्यांच्या हातातले सगळे संपलेले आहे. कोणीही हातामध्ये आता राहिलेले नाही. तशीच अवस्था आता आदित्य ठाकरे यांची झालेली आहे.
अर्जुन खोतकर म्हणाले, संसदेत किंवा विधिमंडळात खासदार, मंत्री, आमदार अशा प्रकारचे स्नेहभोजन आयोजित करत असतात. त्या स्नेह भोजनाला निमंत्रण आला असेल तर शिवसेना उबाठाचे काही लोक गेले असेल. त्यामुळे असे बंधन कुणावर टाकता येत नाही, असेही ते म्हणाले.