जळगाव : प्रतिनिधी
जनता एक्सप्रेसमधून रेल्वेतील परप्रांतीय प्रवाशांचे तीन मोबाईल व रोख रक्कम असा एकुण ६० हजारांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. रविवारी दुपारच्या सुमारास शहरातील मेहरुण परिसरातून या टोळीतील चौघांना अटक करण्यात आली. संशयितांना पुढील कारवाईसाठी चाळीसगाव लोहमार्ग पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहार येथील रोहित विमल यादव (वय २३) हे दोन मित्रांसोबत रविवार दि. २ जून रोजी मुंबईहून पटणा येथे जण्यासाठी निघाले. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी तिघेजण रेल्वेत झोपलेले असतांना तीन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकुण ६० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला याप्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चारही चोरटे हे जळगाव शहरातील असल्याचे समोर आले. त्यानुसार रेल्वे पोलीसांनी एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधुन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती मिळाली.
एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने कारवाई करीत संशयित गुरूजितसिंग सुजानसिंग बावरी (वय २५ रा. तांबापुरा), शेख अजर शेख मजर (वय २८ रा. सुप्रिम कॉलनी), सुधिर सुभाष भोई (वय १९) आणि अल्ताफ फिरोज खान (वय २० दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी) यांना मेहरूण परिसरातन अटक केली त्यांच्याकडून चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.
ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोउनि दिपक जगदाळे, पोहेकॉ समाधान टाहाकडे, विकास सातदिवे, किशोर पाटील, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, इम्रान बेग यांच्यासह जळगाव रेल्वे सुरक्षा बलचे अधिकारी पो.नि. देविप्रसाद मिना, उपनिरीक्षक के. आर. तड, पीडी पाटील, महेंद्र कुसावा, विनोद जेटवे आणि विनोद कुमार यांनी केली आहे. पुढील कारवाईसाठी अटकेतील संशयितांना लोहमार्ग पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.