चोपडा : प्रतिनिधी
इंधनाचे भाव सतत वाढतच आहेत. शेतीमालाला भाव नाही. शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत. दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ म्हणणारे आज त्या विषयावर बोलत नाहीत. सत्ता लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते; परंतु केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी चोपडा, मुक्ताईनगर आणि भुसावळ येथे आयोजित सभेत केली.
पवार म्हणाले की, हमीभाव मिळावा म्हणून दिल्लीत वर्षभर शेतकरी आंदोलन चालले; तिथे जायला सत्ताधाऱ्यांना वेळ मिळाला नाही. उलट शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्या गेल्या शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांची अशी अवस्था ही देशासाठी चांगली बाब नाही. महागाईचे मुद्दे सोडून भाजप समाजात तेढ निर्माण करीत आहे. केंद्र सरकार हे मूठभर लोकांच्या हिताची जपणूक करणारे आहे, जनतेला आता बदल हवा आहे. असे हि ते म्हणाले.
सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रावेर मतदारसंघातील उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासह, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार सतीश पाटील, संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, रोहिणी खडसे, प्रतिभा शिंदे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.