मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहे. यात ठाकरे गटाने थेट पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.
‘एक संविधान, एक कायदा, एक देश’ ही भाषा मोदींच्या तोंडी शोभत नाही. मोदी यांनी लोकांना दहा वर्षे मूर्ख बनवले असा हल्लाबोल ठाकरे गटाने मुखपत्रातून केला आहे. तसेच हे मूर्ख बनवण्याचे दुकान लोकांनीच बंद करावयाचे ठरवले आहे अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे. शिवाय अजित पवार वगैरे लोकांना तर तुरुंगात चक्की पिसायला पाठवायचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. ते पवार आज फडणवीसांच्या टेबलावर बसून सत्तेचे पत्ते पिसत आहेत असेही म्हणत आज ठाकरे गटाने पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
”मोदी यांचा कारभार संविधानविरोधी आहे व पुन्हा ते महाराष्ट्रात येऊन नैतिकता व साधनशूचितेच्या गप्पा मारतात. हा मूर्ख बनवण्याचा धंदा आहे व मोदी यांनी हा धंदा जोरात चालवला आहे. जात प्रमाणपत्राचा घोटाळा करणाऱ्या नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश करताच त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळतो व अशाच प्रकरणात रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द केली जाते. एक अपराध व दोन न्याय हे मोदी राज्यातच घडू शकते. त्यामुळे ‘एक संविधान, एक कायदा, एक देश’ ही भाषा मोदींच्या तोंडी शोभत नाही. मोदी यांनी लोकांना दहा वर्षे मूर्ख बनवले. हे मूर्ख बनवण्याचे दुकान लोकांनीच बंद करावयाचे ठरवले आहे”, असे ठाकरे गटाने म्हंटले आहे.
”विरोधक जनतेला मूर्ख बनवताहेत, असे गमतीचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात येऊन केले. शहाणपणाच्या भूमिकांबद्दल मोदी यांची कधीच ख्याती नव्हती. त्यात आता निवडणुकांचा मोसम असल्याने मोदींच्या वक्तव्यांचा शिमगाच सुरू झाला आहे. मोदी सरकारने दहा वर्षे देशाला व जनतेला मूर्खच बनवले याबाबत दुमत असण्याचे कारण नाही, पण विरोधक जनतेला मूर्ख बनवत असल्याचा फटाका मोदी यांनी फोडला”, असे म्हणत ठाकरे गटाने मोदींच्या विधानाचा समाचार घेतला आहे.