जळगाव : प्रतिनिधी
आमदार एकनाथ खडसे भाजपात जाणार अशा चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहेत. या चर्चाना आ. एकनाथ खडसे यांनी बुधवारी पुर्ण विराम दिला असून आपण आपल्या सुप्रिम कोर्टाच्या तारखेसाठी दिल्लीला गेलो होतो. तेथे कोणाचीही भेट घेतली नाही, त्यामुळे मी भाजपात जाण्याच्या चर्चेत कोणतेच तथ्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
आ. खडसे म्हणाले की, आपण भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु असा निर्णय एका दिवसात घेतला जात नाही, असा निर्णय घ्यावयाचा असला तर, कार्यकर्त्यांना व सहकार्यांना विश्वासात घेवूनच असा निर्णय होत असतो. असा महत्वाचा विषय असल्यास ज्या पक्षाने आजपर्यंत मदत केली त्या पक्षालाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि अशी कुठलीच प्रक्रिया मी केलेली नाही त्यामुळे तुर्तास या विषयाला पुर्ण विराम दिला पाहिजे असे मला वाटते, असे खडसे यांनी स्पष्ट केले.
आ. एकनाथ खडसे भाजपात येण्यासाठी खटाटोप करीत असल्याचे ना. गिरीष महाजन यांच्याकडून सांगण्यात येते. त्यावर खडसे म्हणाले की, मला भाजपात प्रवेश करायचा असल्या खूप काही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, मोदीजींपासून नड्डाजी, अमित शहा यांच्यासह वरीष्ठांशी पण माझे चांगले संबध आहेत. त्यामुळे मला भाजपात जायचे असेल तर, इतर भाजप नेत्यांची गरज नाही. सर्वांना असा टोला त्यांनी ना. गिरीष महाजन यांना लगावला. पत्रकारांनी आ. खडसे यांना खा. उन्मेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्याबद्दल विचारले असता आ. खडसे म्हणाले की, खा. उन्मेश पाटील भाजपमध्ये सक्षमपणे काम करत होते. ते लोकसभेत टॉप टेनमधील खासदार होते. परंतु तरीही त्यांचे तिकिट कापले गेले त्यामुळे त्यांची खंत दिसतेय आणि त्यांनी कोणत्या पक्षात जावे हा त्यांचा वैय्यक्तीक प्रश्न आहे.