नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून मनसे लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी ठाम असतांना नुकतेच राज ठाकरे हे अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. वास्तविक आमची भूमिका ही आहे की राज ठाकरे यांना सोबत घेण्याची गरज नाही. राज ठाकरेंबाबत भाजप काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल. पण राज ठाकरे युतीसाठी भेटलेले असावेत वाटत नाही. मात्र ते आल्याने फार फायदा होईल, असं मला वाटत नाही. त्यामुळे वरिष्ठ योग्य निर्णय घेतील, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकाळात कधीही होऊ न शकलेली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रलंबित स्मारके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झाल्याचे सांगत, तेच खऱ्या अर्थाने देशाचे विकास पुरुष असल्याचा दावा आठवले यांनी केला. भारतीय जनता पक्ष संविधान संपवीत आहे, अशी निव्वळ अफवा असल्याचेही त्यांनी सांगितले.
रामदास आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणतात शब्द दिला होता, पण अमित शहा नाही म्हणतात, पण सत्ता पन्नास टक्के ठरले होते. मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले नव्हते, कारण निवडणूक प्रचारामध्ये देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांची भूमिका मांडली होती. तेव्हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली नाही. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपची सत्ता बसणार नव्हती. त्यावेळी आडमुठी भूमिका घेऊन त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. 40 आमदार शिवसेनेचे आणि 10 अपक्ष आमदार घेऊन एकनाथ शिंदे भाजपसोबत आले. पक्षफुटीला नेतेच जबाबदार आहेत. पक्षफुटीला ईडी वैगेरे कारणीभूत असण्याची गरज नाही, त्याला नेते कारणीभूत आहेत, असेही ते म्हणाले.



