मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणूक येत्या दोन ते तीन दिवसात जाहीर होत असतांना आज देखील राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीने उमेदवार जाहीर केले नाही तर दुसरीकडे महायुतीत असलेल्या भाजपच्या हायकमांडने शिंदें शिवसेनेच्या १२ पैकी ६ खासदारांचे तिकीट कापून नवे उमेदवार द्यावेत, या अटीवर भाजप ठाम आहे.
शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीच्या जागावाटपाचे कोडे सोडवण्यासाठी प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची सोमवारी दिल्लीत बैठक झाली. त्यातमहाराष्ट्रात ३० पेक्षा एकही जागा कमी घ्यायची नाही, असा पुनरुच्चार भाजपच्या केंद्रीय नेत्यांना केला. शिंदेसेनेला १२ व अजितदादा गटाला ६ जागा दिल्या जातील. आतापर्यंत भाजपच्या या अटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नकार दिला होता. मात्र त्याशिवाय चर्चा पुढे जाणारच नाही असा पवित्रा भाजपने घेतल्यामुळे शिंदेंना आता उमेदवार बदलण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिंदे, अजित पवार व भाजपच्या नेत्यांची दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यात भाजपच्या अटी-शर्ती मान्य करण्याबाबत शिंदे, पवार निर्णय घेतील व त्यानंतर जागावाटप जाहीर होईल,अशी माहिती एका ज्येष्ठ मंत्र्याने दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसला आधी चारच जागा देऊ केल्या होत्या. मात्र किमान प्रत्येक महसूल विभागात एक तरी जागा मिळावी यासाठी अजित पवार आग्रही होते. त्यामुळे दादा गटाला कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ अशा चार, तर पश्चिम महाराष्ट्रात दोन अशा सहा जागा मिळू शकतात. मात्र रायगडमध्ये सुनील तटकरेंएेवजी दुसरा उमेदवार द्या, अशी भाजपची सूचना आहे.
हातकणंगलेचे धैर्यशील माने, हिंगोलीचे हेमंत पाटील, वाशिम-यवतमाळच्या भावना गवळी, उत्तर पश्चिमचे गजानन कीर्तिकर यांच्यासह इतर दोन खासदारांबद्दल जनतेतून नकारात्मक अहवाल आल्याचा भाजपचा दावा आहे. त्यामुळे तेथे उमेदवार बदलावेत, अशी अट अमित शाह यांनी शिंदे यांना घातली अाहे. दिल्लीच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची सोमवारी बैठक झाली, त्यात जागावाटपाचा मुद्दा चर्चेला आला. ‘वरिष्ठ नेत्यांमध्ये काय चर्चा सुरू आहे, कधीपर्यंत अंतिम निर्णय होईल,’ असे प्रश्न तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विचारले. त्यावर तिघांनीही सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच निर्णय होईल, असा दिलासा सर्वांना दिला.